मा. विवेक सावंत
शरदचंद्र पवार शिक्षण पाठ्यवृत्ती

शिक्षण उद्यासाठी असते. उद्याचे सुजाण, सतर्क, सर्जनशील, कर्तबगार व सुसंस्कृत नागरिक घडविणे खऱ्या, उचित व उत्तम शिक्षणाकडून अपेक्षित असते. शिकावे कसे, शिकण्याचा आनंद कसा घ्यावा-द्यावा आणि आजन्म शिकत कसे राहावे हे शिकविते ते खरे शिक्षण. शिकता-शिकता जे उद्याची आव्हाने पेलायला सज्ज करते, उद्याच्या संधींचे सोने करायला शिकवते ते खरे शिक्षण.

एकविसाव्या शतकातील एकविसाव्या वर्षापासून शालेय शिक्षणाच्या मुलभूत पुनर्रचनेची या दृष्टीने नितांत आवश्यकता आहे. कारण विशेषत: गेल्या वर्षीपासून दैनंदिन जीवनाचे संदर्भ पार बदलून टाकणाऱ्या अनेक वेगवान महाप्रवाहांचा प्रभाव एकाच वेळी जगभर वाढू लागला आहे.

बदल घडवून आणणारे शेती, औद्योगिक क्रांती, इ. महाप्रवाह इतिहासात पूर्वीही येऊन गेले आहेत. परंतु त्यांचे जगभर परिणाम दिसायला शतके लागली. विद्युत उर्जेच्या महाप्रवाहाने जगाला कवेत घ्यायला, पृथ्वीवर ‘इलेक्ट्रिकल सिव्हिलायझेशन’ साकारायला शतक लागले. संगणन व माहिती तंत्रज्ञानाच्या महाप्रवाहाने जगावर अधिराज्य प्रस्थापित करायला अर्धशतक लागले. आताचे बदल घडविणारे महाप्रवाह मात्र कमालीचे वेगवान आहेत. त्यांचे परिणाम अनुभवास यायला आता पाच-दहा वर्षेही लागत नाहीत. त्यांच्या प्रचंड वेगापुढे मानवी समाजाची दमछाक होताना आपण पाहतो आहोत.

वेग, अधिक वेग आणि प्रचंड वेग हेच त्या महाप्रवाहांचे आणि त्यांनी प्रभावित केलेल्या मानवी जीवनाचे आता व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. यातले काही महाप्रवाह अनिष्ट आहेत तर काही इष्ट. उदाहरणार्थ एकीकडे अनिष्ट हवामान बदल तर दुसरीकडे इष्ट ज्ञानक्रांती. हे महाप्रवाह दीर्घ काळ टिकून राहतील व वेगाने वाढत जातील अशी चिन्हे आहेत. या महाप्रवाहांमुळे मानव जातीपुढे व विशेषत: विद्यर्थ्यांपुढे जशी अनेक नवी आव्हाने उभी ठाकली आहेत तशाच नव्या संधीही निर्माण झाल्या आहेत.
अशा अनेक महाप्रवाहांचा, आव्हानांचा आणि संधींचा अनुभवजन्य परिचय विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणादरम्यान होणे आवश्यक आहे. तसे केल्यासच त्यांचे शिक्षण जीवनाभिमुख, भविष्यवेधी व म्हणूनच अर्थपूर्ण होऊ शकेल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि देशाचे भवितव्य केवळ सुरक्षितच नव्हे तर उज्ज्वलही होऊ शकेल. पण तसे न केल्यास आपण त्यांना भूतकाळासाठी तयार करू!

हे महाप्रवाह, आव्हाने व संधींच्या संदर्भातील “नवशिक्षणाची नवी उद्दिष्ट्ये काय असायला हवीत व अशा उद्दिष्टांच्या परिपूर्तीसाठी प्रचलित शिक्षण व्यवस्थेत केवळ सुधारणा (रिफॉर्म) करून चालणार नाही तर त्यात विचारपूर्वक परिवर्तन (ट्रान्सफॉर्म) घडवून आणावे लागेल. प्रचलित व्यवस्था काहीशी बंदिस्त व साचेबंद आहे. त्यामुळे त्यातील ठराविक अभ्यासक्रम व त्याच्या ठराविक पद्धतीच्या अध्यापन, अध्ययन व मूल्यमापनातून शिक्षणाचे परिवर्तन घडवून आणण्याला मर्यादा आहेत. त्या व्यवस्थेतून नवे महाप्रवाह, नवी आव्हाने व नव्या संधी यांच्या संदर्भात होऊ शकणाऱ्या विद्यार्थी विकासालाही मर्यादा आहेत.

नवशिक्षणाची नवी उद्दिष्ट्ये कितीही अवघड असली तरीही तशा परिवर्तनासाठी शिक्षक या त्यातल्या त्यात अधिक प्रभावी घटकापासून सुरुवात करता येईल. जिद्दीने प्रयत्न करू शकणाऱ्या शिक्षकांना हुडकून काढून प्रशिक्षण व प्रोत्साहन द्यावे लागेल. प्रचलित शिक्षण व्यवस्थेत विषयनिहाय अपेक्षित असलेली पाठ्यपुस्तकांमधील किमान उद्दिष्ट्ये वरील आव्हाने व संधींचा परिचय होण्यासाठी आधारभूत आहेत. पण पुरेशी मात्र नाहीत. ती किमान उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी योग्य ते अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन हे प्रत्येक शिक्षकाने उत्कृष्ट गुणवत्तेने केलेच पाहिजे. व्यवस्थेची व समाजाची ती किमान अपेक्षा आहेच. पण नव्या परिवर्तनासाठी त्या पलिकडे जावे लागेल. केवळ ‘विषयांचे शिक्षक’ हे साध्य करू शकणार नाहीत. त्यासाठी हवेत ‘विद्यार्थ्यांचे शिक्षक’.

त्यामुळे किमान अपेक्षांची उत्तम परिपूर्ती करणाऱ्या पण तेथेच न थांबता त्यापुढे जाऊन आपल्या प्रतिभेने व अतिरिक्त प्रयत्नांनी विशिष्ट शैक्षणिक परिवर्तन घडवून आणू शकणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देणे उचित होईल. ती परिवर्तनाची उचित सुरुवात ठरेल. अशा शिक्षकांनी हे महाप्रवाह, त्यातील आव्हाने व संधी यांचा निरंतर अभ्यास करून अध्यापनात व शालेय उपक्रमात सतत अनुकूल बदल करायला हवेत.
अशा परिवर्तनशील शिक्षणाची अर्थात ‘नवशिक्षणा’ची सुरुवात सध्याच्या शालेय पर्यावरणाशी मेळ राखत, त्यातील सर्व सहभाग-धारकांचे जास्तीत जास्त सहकार्य मिळवून व विरोध टाळून करावी लागेल. योग्य अशा व नानाविध प्रकारच्या अभ्यासक्रमेतर कृतीशील उपक्रमांमधून, वेळापत्रकेतर वेळात व चाकोरीबाह्य पद्धतीने ती करणे उचित ठरेल. तसे होतकरू व उपक्रमशील शिक्षक या फेलोशिपसाठी पात्र ठरतील. अशा शिक्षकांकरवी परिवर्तनाची सुरुवात करता येईल.

उत्साही, हिकमती, नाउमेद न होता अडचणींचे संधीत रुपांतर करणाऱ्या, विशिष्ट ज्ञान क्षेत्रे, विद्या किंवा कलांमध्ये तरबेज असलेल्या, विद्यार्थ्यांचा विकास करण्यात मनापासून रस असलेल्या, ‘हटके’ प्रवृत्तीच्या शिक्षकांच्या नानाविध उपक्रमांद्वारे हळूहळू हे ‘नवशिक्षण’ मुख्यप्रवाही करण्याचा मार्ग सापडू शकेल. अशा शिक्षकांना आपण ‘बलशाली मार्गशोधक’ किंवा ‘पाथफाइंडर’ किंवा ‘इंस्पायरर फेलोज्’ म्हणूया.

आपल्यला असे शिक्षक शोधून काढावे लागतील. विहित अभ्यासक्रमकेंद्री अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन या पलिकडे जाऊन सातत्याने परिवर्तनशील कामगिरी केलेल्या शिक्षकांची निवड करावी लागेल. वेळापत्रकापलिकडे जाउन, अभ्यासक्रमापलिकडच्या कल्पक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांची जडणघडण करू पाहणाऱ्या व त्यासाठी चाकोरीबाह्य विचार व कृती करणाऱ्या शिक्षकांचा शोध घ्यावा लागेल. त्यांना नवशिक्षणाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी वाव, पाठबळ, मदत, प्रोत्साहन, प्रशिक्षण, मार्गदर्शन व प्रतिष्ठा द्यावी लागेल.

त्यांना नवी आव्हाने व संधींशी सुसंगत अशा त्यांच्या पसंतीच्या व प्राविण्याच्या उपक्रमांच्या आरेखन व अंमलबजावणीसाठी रोख रक्कम व सातत्यपूर्ण मार्गदर्शन या स्वरूपातील शिष्यवृत्ती / प्रकल्प-वृत्ती देण्यात येईल. त्या प्रकल्प-वृत्तीस “माननीय श्री. शरद पवार इन्स्पायर फेलोशीप” असे संबोधण्यात येईल.